Lai Avadtes Tu Mala Serial Track : कुणाचीच लव्हस्टोरी ही सरळ, सोपी नसते, नाही का? बऱ्याचदा आपला जीव ज्या माणसावर जडला आहे, त्याच्यासोबत लग्न गाठ बांधताना, सहजीवनाचा प्रवास अगदी सोपा होत जातो कुठलेही अडथळे न येता, कुठल्याही विरोधाला सामोरं न जाता अगदी निर्विघ्नपणे पार पडतो. पण काही लव्ह स्टोरी अशा असतात, ज्यांना अग्निदिव्यातून जावं लागतं. रोज नवी संकटं, नवी आव्हानं आणि नवे पेच. इतक्या कठीण काळात देखील प्रेम टिकून राहणं आणि एकमेकांच्या साथीनं ते अग्निदिव्य पार करणं म्हणजे भारीच नाही का? 


अगदी तसंच झालं आहे आपल्या सरकार - सानिकाचं. सुरुवातीपासूनच अशक्य वाटणारी प्रेमकथा अखेर सत्यात उतरली. सरकार सानिका देखील अनेक कट-कारस्थानाला सामोरं गेलं. सई, सर्वेश आणि पंकजा यांनी सरकार सानिकामध्ये दुरावा आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना वेगळं करण्यासाठी अनेक प्लॅन केले. पण, खऱ्या प्रेमापुढे त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले. पण आता खरी परीक्षा सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. साहेबरावांसमोर आता सरकारचं सत्य आल्यानं ते सरकार - सानिकाच्या लग्नाच्या काय तर दोघांच्या प्रेमाच्या देखील विरोधात गेले आहेत. दोन गावामधील वैर पूर्णतः संपून जावे अशी एकीकडे सानिकाची इच्छा तिने सरकारकडे व्यक्त केली तर दुसरीकडे साहेबराव याच वैरामुळे दोघांचा जीव घेण्यासाठी देखील मागे पुढे बघणार नाही असे दिसून येते आहे. येत्या मालिकाच्या भागांमध्ये साहेबरावांचा राग टोक गाठणार आहे, कारण जिवंत सानिकाचं ते श्राद्ध घालणार आहेत. आणि हे सानिकाला कळल्यावर पुढे नक्की काय होईल? ती काय निर्णय घेईल? हे येत्या भागांमध्ये कळेल. 




सरकार सानिकाचे लग्न पार पडत असताना साहेबराव देवळात येतात त्यांना बघताच हल्ला होण्याअगोदरच दोघे तिथून पळून जातात. आता साहेबराव दोघांच्या शोधात आहेत, तर तिथे पंकजा साहेबरावांना भडकावते तुझी पोरीने कळशीच्या पोरासोबत लग्न केल म्हणजे काय? शोना आणि विभा जंगलात सरकार सानिका यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी डेकोरेशन करतात. तर तिथे, साहेबराव सानिका सरकारला जिवंत किंवा मृत पकडून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर करतात.  साहेबरावांचे म्हणणे आहे की सानिका सरकार यांना शिक्षा पोलीस नाही मी स्वतः देणार. सानिका साहेबरावने दिलेली जाहिरात बघते. एकीकडे सानिका सरकार त्यांच्या सुरू होणाऱ्या नवीन संसाराचे स्वप्न बघत आहेत तर दुसरीकडे सावित्रीचा विरोध असूनही साहेबराव सानिकाचं श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतात. 


साहेबराव आपल्या मुलीचा जीव खरंच घेतील? सरकार - सानिका यातून कसे बाहेर पडतील? आप्पासाहेब आणि कळशी गावं या दोघांना गावात येऊ देतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.