मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये एकापाठोपाठ एक केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर टीकेचा धनी बनलेला टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने माफी मागितली आहे. "माझा कोणालाही दुखवायचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो," असं पंड्या म्हणाला.


'कॉफी विद करण'मध्ये महिलांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. 25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. यानंतर लोक सोशल मीडियावर जोरदार टीका करत आहे. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.

या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान"


आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.

यानंतर हार्दिक पंड्यावर टीका सुरु झाली आणि लोकांनी बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना अशाप्रकारच्या चॅट शोमध्ये जाण्यापासून रोखलं पाहिजे असा सल्ला दिला. तर बीसीसीआयने मंगळवारी पंड्याकडून 'आक्षेपार्ह आणि लाजिरवाण्या टिप्पणीवर उत्तर देण्यास सांगितलं होतं.

दुखापतीमधून सावरल्यानंतर हार्दिक पंड्या बॉक्सिंग डे कसोटीआधी भारतीय संघात सामील झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मालिकेतही तो खेळणार आहे.