मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवर सुरु असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने चांगलाच वेग धरला आहे. राणादा आणि पाठकबाई यांची लग्नानंतर फुलत जाणारी प्रेमकथा पाहण्यात प्रेक्षकांनाही उत्कंठा वाटत आहे. मात्र रील लाईफमध्ये अंजली साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरच्या मनात 'का रे दुरावा'फेम जय अर्थात अभिनेता सुयश टिळक बसल्याचं म्हटलं जात आहे.


अक्षया देवधर आणि सुयश टिळक एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. यामागील कारण म्हणजे अक्षयाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले दोन फोटोज. अक्षया आणि सुयश एका रेस्टॉरंटमध्ये बसले असतानाचा फोटो तिने शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये 'मिसिंग यू.. ! सुयश टिळक लव्ह ❤' असं लिहिलं आहे.



दुसऱ्या फोटोमध्ये सुयशसोबत रंगपंचमी खेळतानाचा फोटो अक्षयाने शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्येही 'इट्स अ लव्हली डे' ❤ असं लिहिलं आहे. अक्षया आणि सुयश दोघंही मूळ पुण्याचे आहेत. सुयशची मुख्य भूमिका असलेली 'का रे दुरावा' मालिका संपल्यानंतर सध्या तो कलर्स वाहिनीवरील 'सख्या रे' या मालिकेत झळकत आहे. मात्र शुटिंगच्या निमित्ताने कोल्हापूर आणि मुंबई असा असलेला दुरावा तिला छळत असावा, अशी अटकळ बांधली जात आहे.