Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या काही चांगल्या-वाईट गोष्टींवरही तो भाष्य करतो. सामाजिक-राजकीय मुद्यांवर निर्भिडपणे शशांक भाष्य करतो.  आता शशांकने व्हिडीओ शेअर करत मुंबई महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये जाताना शंशाकला मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग आढळला. त्यावरून त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. हा सगळा कचरा उचलून महानगरपालिकेच्या ऑफिसच्या दारासमोर ओतला तर आवडेल का? असा संतप्त सवालही त्याने केला आहे. 


छोट्या पडद्यावरील ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेमधून  अभिनेता शशांक केतकर हा घराघरांत पोहचला. शशांकने सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. आता, त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने गोरेगाव येथील फिल्मसिटीच्या परिसरात असणाऱ्या कचऱ्याच्या ढीगावर संताप व्यक्त केला.


शशांकने काय म्हटले?


शशांकने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. !!!!!


मुंबईची फिल्मसिटी बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ???? ही अवस्था , हे चित्र काही आजचं नाहीये… मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून BMC office समोर ओतला तर आवडेल????? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरीक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे? असा सवालही शशांकने केला आहे. 






अभिनेत्री अभिज्ञा भावेनेदेखील शशांकच्या मताशी सहमती दर्शवली. राजकारणावर भाष्य करताना आपण आपली जबाबदारीदेखील विसरून गेलो आहोत. इतरांच्या जबाबदाऱ्यांवर निबंध लिहिले जातील, पण स्वत:च्या जबाबदाऱ्या बजावण्याची वेळ येते तेव्हा कारणांची यादी असते. आपल्या सगळ्यांना कचऱ्यात राहायला आवडतं असेही तिने म्हटले.  शशांकच्या चाहत्यांनीदेखील त्याच्या या मताशी सहमती दर्शवत नागरिकांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे असे मत व्यक्त केले.