मुंबई : दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर आपल्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते वादात सापडले आहेत. यावेळी सोनी मराठी या चॅनेल वरील मालिकेवरुन त्यांनी प्रेक्षकांना चांगलेच धारेवर धरले आहे. महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सावित्री ज्योती' ही मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहेत. यावरच प्रसिद्ध निर्माते महेश टिळेकरांनी सध्याच्या मालिका आणि त्यातील विषय यावर फेसबुक पोस्ट लिहीत आपलं परखड मत मांडलं आहे.


याला जबाबदार कोण?
टिळेकर म्हणाले की, 'फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?'


'नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कशाला म्हणायचं असा प्रश्न पडतो. पण पाहणारे हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानणारे आणि कामाच्या मिळालेल्या पैशांत सुख मानणारे कलाकार आहेत. बऱ्याचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रिअॅलिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि मर्यादा राखून लोकांचं मनोरंजन करणारे विनोदी कलाकारही आहेत.'






उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल, की जीव तोडून मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही. सावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी? असा प्रश्नही टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.