Ranveer Allahbadia Controversy: अलिकडेच समय रैनाच्या (Samay Raina) 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं (Ranveer Allahbadia) आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं.  तेव्हापासूनच तो निशाण्यावर आला आहे. रणवीरच्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आणि रणवीर अलाहाबादियासोबतच 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या त्या भागात उपस्थित असलेल्या सर्वांचा पाय खोलात गेला. या शो विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. 


रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वक्तव्याविरोधात सिनेकलाकारांपासून राजकारणी, महिला आयोग आणि इतर विविध घटकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया कुठेतरी गायब झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा फोन बंद असून पोलिसांचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, अशा चर्चा सुरू होत्या. यासर्व चर्चांदरम्यान आता स्वतः रणवीर अलाहाबादियानं सर्वांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे. रणवीरनं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. 


इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये रणवीरनं म्हटलं आहे की, तो पळून जात नाहीये आणि त्याला भारताच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पुढे बोलताना रणवीरनं असा दावा केला आहे की, त्याला जीवे मारण्याच्या आणि त्याच्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याच्या धमक्या येत आहेत. 


मी आणि माझी टीम पोलीस आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करतोय : रणवीर अलाहाबादिया


रणवीरनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी आणि माझी टीम पोलीस आणि दुसऱ्या सर्व अथॉरिटीजसोबत को-ऑपरेट करत आहोत. योग्य त्या कार्यपद्धतीचा मी अवलंब करणार आहे आणि सर्व एजन्सीना तपासकार्यात मदत करणार आहे. 






माझ्या आईच्या क्लिनिकवर पेशंट बनून हल्ला : रणवीर अलाहाबादिया


रणवीर अलाहाबादियानं पुढे लिहिलं की, "आई-वडिलांबाबत मी जे काही बोललोय, ते खूपच इंसेंसिटिव आणि अपमानजनक होतं. ही माझी नैतिक जबाबदारी आहे की, मी असं करायला नको होतं आणि मी यासाठी खरंच मनापासून सॉरी बोलतोय." पुढे बोलताना रणवीरनं पोस्टमध्ये सांगितलं की, "मला अनेकांनी जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ते म्हणतायत की, ते माझा जीव घेतील आणि माझ्या कुटुंबालाही मारतील. लोकांनी माझ्या आईच्या क्लिनिकवर पेशंट बनून हल्ला केला आहे. मला खूप भिती वाटतेय आणि समजत नाहीये की, काय करू..." 


मला पोलीस आणि आपल्या देशाच्या कायदा-सुव्यवस्थेवर विश्वास : रणवीर अलाहाबादिया


रणवीरनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय की, "पण, मी पळून गेलेलो नाहीय, मला पोलीस प्रशासन आणि आपल्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे..."


पाहा व्हिडीओ : Ranveer Allahbadia | आधी वक्तव्य नंतर मागितली रणवीर अलाहाबादियानं माफी ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या: 


Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स