Indias Got Latent Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये (Indias Got Latent) करण्यात आलेल्या कमेंट्समुळे समय रैना (Samay Raina), रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia), अपूर्वा मखीजा (Apoorva Mukhija), आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी सर्वात आधी महाराष्ट्र साइबर सेलकडून (Maharashtra Cyber ​​Cell) चौघांनाही समन्स बजावून 18 फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. अशातच आता आसाम पोलिसांनी (Assam Police) देखील चौघांना समन्स बजावलं आहे. 

समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखीजा, आशीष चंचलानी या चौघांविरोधात मुंबई आणि दिल्लीसह, गुवाहाटीमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह, या लोकांना 18 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी पोलीस मुख्यालयातही जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. शुक्रवारी रणवीर अलाहाबादियाबद्दल एक बातमी अशीही आली की, गुरुवारी पोलीस त्याच्या वर्सोवा येथील घरी पोहोचले, तेव्हा त्याच्या घरात कुणीच नव्हतं. त्याचं घर बंद होतं. दरम्यान, यापूर्वी सुरक्षेचं कारण देतं, रणवीरनं पोलिसांना त्याच्या घरीच त्याचा जबाब नोंदवण्याची विनंती केली होती. पण, पोलिसांनी रणवीर अलाहाबादियाची मागणी फेटाळून लावली. 

कॉमेडियन देवेश दिक्षितनं जबाब नोंदवला 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर अलाहाबादियासोबत पोलिसांचा संपर्क होत नाही. दरम्यान, पोलिसांनी या सर्वांना 18 फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्र सायबर सेलनं कॉमेडियन देवेश दिक्षितचा जबाब नोंदवला आहे.  देवेश दिक्षित 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका शोसाठी जज म्हणून उपस्थित होता. या व्यतिरिक्त 'इंडियाज गॉट लेटेंट'शोच्या सर्वच्या सर्व एपिसोडचा व्हिडीओ एडिटर प्रथम सागरचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. आतापर्यंत याप्रकरणी 8 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.