Musafir Cafe Vikrant Messy: नेटफ्लिक्सवरील सध्या एका नव्या वेब सिरीजची तुफान चर्चा रंगली आहे. विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटू आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका असणारी ही सिरीज  प्रेमाची साधी, वास्तववादी आणि भावनिक मांडणीमुळे प्रेक्षकांची मन जिंकत आहे. 'मुसाफिर कॅफे' या सिरीजचं सध्या खूप कौतुक होत आहे. दिग्दर्शक रुचिर अरुण यांनी ही मालिका दिग्दर्शित केली असून ती दिव्य प्रकाश दुबे यांच्या लोकप्रिय हिंदी कादंबरी 'मुसाफिर कॅफे'वर आधारित आहे. शुक्रवारी ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. (Musafir Cafe)

Continues below advertisement

या सिरीजमध्ये विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मर्यादित बजेटमध्ये तयार झालेल्या या मालिकेत विक्रांत मेस्सी हा सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार असल्याचं  समोर येत आहे. विशेष म्हणजे, अभिनयासोबतच विक्रांतने 'होममेड स्टोरीज' या बॅनरअंतर्गत या मालिकेची सहनिर्मितीही केली आहे.

'मुसाफिर कॅफे'च्या कलाकारांचे मानधन

विक्रांत मॅसीला 'मुसाफिर कॅफे'साठी सुमारे 10 ते 15 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मालिकेत त्याने चंदर मोहन शर्मा ही प्रमुख भूमिका साकारली आहे. सुधाची भूमिका साकारणाऱ्या वेदिका पिंटोला अंदाजे 3 ते 5 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले जाते. तर प्रीतीची भूमिका करणाऱ्या महिमा मकवानाला 2 ते 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे. मार्क ही भूमिका साकारणारे अभिनेता आदिल हुसेन यांना 3 ते 4 कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे. याशिवाय राजीव सिद्धार्थ, अनुबा फतेहपुरिया, लव्हलीन मिश्रा आणि सादिया सिद्दीकी यांसारख्या सहाय्यक कलाकारांना त्यांच्या भूमिकेनुसार 80 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळाल्याचे सांगितलं जातंय.

Continues below advertisement

काय आहे कथानक?

'टेरिबली टायनी टेल्स' (TTT) आणि 'होममेड स्टोरीज' निर्मित या मालिकेची निर्मिती व लेखन शारण्य राजगोपाल यांनी केले आहे.कथानक चंदर मोहन शर्मा या अभियंत्याभोवती फिरते. अमेरिकेत यशस्वी करिअर घडवल्यानंतर तो भोपाळमध्ये परततो. कुटुंबाच्या आग्रहाखातर त्याची भेट सुधाशी होते. सुधा ही स्वतंत्र विचारांची घटस्फोट विषयक वकील असून तिचे संपूर्ण लक्ष स्वतःच्या करिअर आणि महत्त्वाकांक्षांवर असते. दोघांमध्ये हळूहळू जवळीक निर्माण होते. मात्र नियतीने काही वेगळंच ठरवलेलं असतं. पुढे चंदर मसुरीला स्थलांतरित होतो आणि तिथे एक कॅफे सुरू करतो. त्याच्या आयुष्यात प्रीतीची एंट्री होते. शांत आणि संयमी स्वभावाची प्रीती, सुधापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. यानंतर चंदर प्रेम, विरह आणि आयुष्यातील दुसऱ्या संधींना कसा सामोरा जातो, याची भावनिक कहाणी मालिकेत उलगडते.

लोकप्रिय कादंबरीवर आधारित मालिका

'मुसाफिर कॅफे' ही मालिका दिव्य प्रकाश दुबे यांच्या गाजलेल्या 'मुसाफिर कॅफे' या कादंबरीवर आधारित आहे. पुस्तकाच्या कथासारानुसार ही कथा केवळ चंदर आणि सुधाच्या प्रेमकथेपुरती मर्यादित नाही. आयुष्यात परिपूर्णता शोधणाऱ्या, स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या आणि स्वतःला हवं तसं आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या भावनिक प्रवासाचं चित्रण या कथेत करण्यात आलं आहे.