Anandi Marathi Serial: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आनंदी’ मालिकेला (Anandi) प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. वेधक कथानक आणि प्रभावी व्यक्तिरेखांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. (Marathi Seral) आता या मालिकेत रामनवमी निमित्त एक खास आणि रंगतदार भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, ज्यात ‘आनंदी’ भारुड सादर करताना दिसणार आहे. सोमवारी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि प्रेक्षकांकडून या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

Continues below advertisement

रामनवमी विशेष भागात ‘आनंदी’ गाणार भारुड

या विशेष भागाची खासियत म्हणजे आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने (Jaaee Khandekar) हे भारुड स्वतः गायले आहे. संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण नसतानाही जाईने हे आव्हान स्वीकारत अत्यंत मनापासून तयारी केली. सुप्रसिद्ध लोककलाकार चंदन कांबळे आणि त्यांचा मुलगा अभिषेक कांबळे यांच्या संकल्पनेतून हे भारुड साकारलं आहे. भारुड ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक प्रेरणादायी आणि समृद्ध कला आहे. या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतानाच मनोरंजनही केलं जातं. जाईसाठी हे सादरीकरण केवळ अभिनयापुरतं मर्यादित नव्हतं, तर एक वेगळा आणि भावनिक अनुभव ठरला. 

प्रेक्षकांना मिळणार भावनिक -प्रेरणादायी अनुभव

या अनुभवाविषयी सांगताना जाई म्हणाली, ‘ भारुडाला न्याय देता येईल का याची सुरुवातीला भीती होती. पण चंदन कांबळे सरांनी इतकं सुंदर लिखाण केलं आहे की ते सादर करताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. जवळपास दोन आठवडे आम्ही या सादरीकरणासाठी मेहनत घेतली आणि प्रत्येक क्षण खूप काही शिकवणारा ठरला. या भारुडाच्या माध्यमातून ‘आनंदी’ मालिकेच्या कथानकाला एक महत्त्वाची कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. संपूर्ण टीमसाठीही हा भाग विशेष ठरला असून या सादरीकरणातून आम्हा सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली आहे. हे भारुड नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा विश्वास आहे. तेव्हा नक्की पाहा ‘आनंदी’ रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.  

'आनंदी' या मालिकेत तरुणी अपघातात दृष्टी गमावते.  तरीही ती आयु्ष्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. 'आनंदी'ला जरी आपल्या डोळ्यातून जग दिसत नसले तरीही, मनाने आणि संवेदनातून ती संपूर्ण जग अनुभवत असते. आनंदीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या वेगळ्या धाटणीच्या मालिकेत आपल्याला एका अंध मुलीची कथा पाहायला मिळणार आहे.  या मालिकेतील 'आनंदी'चा साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.