Marathi Actor Angry On Who Burst Crackers Late Night: सगळीकडे दिवाळी (Diwali 2025) मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. दिव्यांचा लख्ख प्रकाश, मोठमोठ्या रांगोळ्या, आकर्षक रोषणाई यामध्ये अवघा देश न्हाऊन निघाला आहे. त्यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी आहेच, पण काहीजण मात्र उगाच कसेही वागतात, कधीही फटाके फोडतात. त्याचा नाहक त्रास मात्र इतरांना सहन करावा लागतो. असाच अनुभव एका मराठी अभिनेत्यालाही झालाय, त्यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
'ठरलं तर मग' फेम मराठी अभिनेता (Marathi Actor) चैतन्य सरदेशपांडेनं (Chaitanya Sardeshpande) रात्री-बेरात्री फटाके फोडणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, यासंदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने व्हिडीओ शेअर करत रात्री फटाके फोडणाऱ्यांना नरकात पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हणाला अभिनेता?
मराठी टेलिव्हिजन अभिनेता चैतन्य सरदेशपांडे म्हणाला की, "सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...सगळं मान्य आहे. पण म्हणून रात्री अडीच वाजता कोण फटाके फोडतंय? आणि का? रात्री अडीच ही कोणाची पहाट आहे? भाई तुला उठायचंय तर उठ... रात्री 1 वाजता उठ... माझं काहीच म्हणणं नाहीये. अभ्यंगस्नान कर, उटण्याने अंघोळ कर... सुतळी बॉम्बच्या सुतळीने अंग घास मला काहीच घेणंदेणं नाहीये... पण अडीच वाजता नको रे फटाके फोडू. अडीच ही पहाट नसते. तू काय जपानमध्ये जन्माला आलाय का? रात्री अडीच वाजता फटाके फोडले ना त्याच्यामुळेच विराट कोहलीची झोप झाली नाही. दुसऱ्या दिवशी तो आऊट झाला. दिवाळी पहाट आहे म्हणे..."
"मला मान्य आहे की नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं लागतं नाहीतर तुम्ही नर्कात जाता. पण, तुला असं का वाटतंय की अडीच वाजता फटाके फोडून तू नरकात जाणार नाहीस? तू जाणारेस नरकात...तू नाही गेलास तर मी घेऊन जाईन आणि दारापर्यंत सोडून येईन. जर तुला त्यांनी घेतलं नाही तर मी वशिला लावीन... नरकाच्या दारात उभं राहून अशी लाथ घालेन तुला आणि मग ओरडेन हॅपी दिवाली... तेव्हा कळेल...", असंही त्याने पुढे म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :