Kedar Shinde On Bharat Jadhav: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Movies) असो वा मराठी रंगभूमी (Marathi Theatre), अनेक जोड्यांनी धुमाकूळ घातला आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यातील काही जोड्या अभिनेता आणि अभिनेत्रीच्या होत्या. तर काही, सुपरस्टार अभिनेता आणि दिग्दर्शकाची... आज आम्ही तुम्हाला सांगतोय मराठी सिनेसृष्टी, मराठी मालिकाविश्व आणि मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालणाऱ्या दिग्दर्शकाच्या आणि एका यशस्वी सर्वसामान्यांना भावलेल्या नटाच्या जोडीबाबत. ही जोडी म्हणजे, मराठीतले प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि अभिनेते भरत जाधव (Bharat jadhav).
केदार शिंदे आणि भरत जाधव, ही जोडगोळी मराठीतली ही सर्वात यशस्वी जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्स एकत्र केलेत. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये एकत्र काम केलं. अनेक सुपरहिट सिनेमे, नाटकं केल्यानंतर दोघांमध्ये मिठाचा खडा पडलाच. एकमेकांचे अत्यंत जवळचे, घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जाणारे दोघेही तब्बल 9 महिने एकमेकांशी बोलले नाहीत, एकमेकांची तोंडही पाहिली नाहीत. पण झालेलं काय? दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलेलं? याबाबत आता स्वतः दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितलं आहे. एका मुलाखतीत बोलताना आपल्या जवळच्या मित्रासोबतच्या 9 महिन्यांच्या अबोल्यावर त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे.
भरत जाधव यांच्यासोबतच्या अबोल्यावर केदार शिंदे काय म्हणाले?
केदार शिंदे यांनी नुकतीच 'मुक्कामपोस्ट मनोरंजनला'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना अंकुश चौधरी, भरत जाधव आणि त्यांच्या मैत्रीविषयी विचारलं गेलं. त्यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे भरत जाधव यांच्यासोबतच्या अबोल्यावर बोलताना म्हणाले की, "असं अंकुश चौधरीबरोबर झालं नाही. गेली 50 वर्षे आम्ही एकत्र होतो, अजूनही आहोत आणि यापुढेही 50 वर्ष एकत्र राहण्याची इच्छा आहे. जो काही वाद किंवा संवाद झाला होता, तो भरत जाधवबरोबर झाला होता. हे मी ना मंजूर करणार नाही. मैत्रीत या गोष्टीसुद्धा घडतात".
"भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. मी आठव्या मजल्यावर आणि भरत दहाव्या मजल्यावर राहत होता. ही 'सही रे सही' नाटकाच्या आधीची म्हणजेच, 2000 सालची गोष्ट आहे. आमच्या दोघांमध्ये काही मतभेद आणि गैरसमज झाले होते. आम्ही दोघे एकमेकांसमोर यायचो, मी त्याच्या समोरून जाताना त्याच्याकडे बघत नव्हतो आणि तोसुद्धा माझ्याकडे बघत नसायचा. आमचं कुटुंब एकमेकांबरोबर बोलायचे, माझी बायको आणि त्याची बायको एकमेकींबरोबर बोलत होत्या. पण मी भरतशी बोलत नव्हतो आणि तो माझ्याशी बोलत नव्हता.", असं केदार शिंदे म्हणाले.
"मग आठ-नऊ महिन्यांनी अशी गोष्ट घडली की, आम्हालाही कळलं नाही आणि आम्ही पुन्हा बोलायला लागलो. त्यानंतर आम्ही परत एकत्र आलो. तर तेव्हा काय झालं होतं हे आता मला आठवत नाहीये आणि मला वाटतं भरतलासुद्धा ते आठवणार नाही. कुठल्या तरी गोष्टीमुळे गैरसमज झाले असतील", असं केदार शिंदे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :