Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) या मालिकेत अक्कलकोटच्या (Akkalkot) कथानकात आता एक मोठा ट्वीस्ट समोर येणार आहे. शिवनाथ आणि राधाच्या बाळाला स्वामींना त्यांच्यापासून दूर का करायचे आहे? त्या दोघांच्या बाळावर स्वामी स्वतःचा अधिक अधिकार का सांगत आहेत? याचे गूढ अधिकच गडद होत असतानाच चावडीवर सुभेदारांनी स्वामींना स्पष्ट ताकीद दिली आहे, चार दिवसांत हा अध्याय संपवा, अन्यथा स्वामींना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा करावी लागेल. स्वामी मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून, त्यांच्या चेहऱ्यावरचं गूढ स्मित अनेक प्रश्न निर्माण करतंय. आता या चार दिवसांत नेमकं काय घडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, नागपंचमीच्या निमित्तानं कथानकाला एक दिव्य आणि अनपेक्षित वळण मिळणार आहे. स्वामींच्या भविष्यवाणीनुसार शिवनाथ आणि राधाला नागपंचमीच्या दिवशी एका मोठ्या 'प्रचिती'चा अनुभव येणार आहे. स्वामींच्या स्थानावर घडणाऱ्या अद्भुत घटनांमुळे भक्त भारावून जाणार असतानाच, दुसरीकडे सदाशिव आणि रेणुकाच्या आयुष्यातही संकट अधिक गडद होत आहे. एका बाजूला श्रद्धा, भक्ती आणि स्वामींचा दिव्य संकेत; तर दुसऱ्या बाजूला बाळाभोवती घट्ट होत जाणारे संकट, या सगळ्यामुळे पुढील भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार आहे.

स्वामींच्या "बाळाच्या आयुष्यातले काटे आम्ही बाजूला करणारच" या शब्दांचा खरा अर्थ काय? शिवनाथ आणि राधा ज्यांना आज स्वतःचं बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी स्वामींपासून धोका वाटतोय, त्यांनाच लवकरच स्वामींच्या कृतीमागचं सत्य समजणार आहे का? आणि चार दिवसांची मुदत संपण्याआधी स्वामी नेमका कोणता चमत्कार घडवणार?

Continues below advertisement

दरम्यान, या सगळ्या घडामोडींमागे मार्तंडचा डावही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामींचं युग संपवण्याच्या आपल्या छुप्या अजेंड्यासाठी मार्तंडनं शिवनाथच्या आरोपांना धार देत सुभेदारांचं लक्ष स्वामींविरोधातील प्रकरणाकडे वळवलं आहे. आता सुभेदारांनी स्वतः स्वामींना चार दिवसांची मुदत दिल्याने मार्तंडच्या डावाला पहिल्यांदाच मोठं यश मिळालं आहे. पण स्वामींच्या सामर्थ्यापुढे मार्तंडचा हा डाव कितपत यशस्वी होईल? स्वामींचं युग संपवण्याचं मार्तंडचं स्वप्न पूर्ण होणार, की त्याचाच डाव त्याच्यावर उलटणार?

दरम्यान, स्वामी बाळासाठीचा आपला हट्ट सोडणार का? शिवनाथ-राधाला स्वामींच्या या असामान्य मागणीमागचं गूढ उलगडणार का? की अख्ख्या अक्कलकोटला हादरवणारा निर्णय घेत स्वामींनाच शिक्षा होणार? नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या या निर्णायक पर्वात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.