मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई योग्य आहे. असा दावा लेखर आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर कंगनानं मात्र ही कारवाई बेदाकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. कंगनाच्या यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे.


कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामध्ये न्यायालयानं खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली असून दंडाधिकारी कोर्टानं नियमबाह्य पध्दतीनं ही कारवाई केल्याचा आरोप कंगनानं या याचिकेतून केला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. अख्तर यांच्यावतीने अॅड. जे भारद्वाज यांनी पुरवणी प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर सादर केलं. ज्यात दंडाधिकारी न्यायालयानं याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचं पूर्ण पालन करण्यात आलं आहे आहे, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. मात्र निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून 9 सप्टेंबर रोजी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 


कंगनाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयानं याची दखल घेत जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे की अख्तर यांच्या या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले आहे. अंधेरी न्यायालयात यावर 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.