मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर केल्या जाणाऱ्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात झालेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो. सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर आरोप करू नयेत. त्यांच्यावर आरोप म्हणजे कोव्हिड योद्ध्यांवर आरोप आहे. जे कोणी असे आरोप करत आहेत मी त्यांची निंदा करतो, असं ते म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबद्दल एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरण सोडविण्यास मुंबई पोलिस पूर्णपणे सक्षम आहे. कोणाकडे काही पुरावा किंवा माहिती असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांना द्यावी. मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्याविरूद्ध कठोर कारवाई निश्चित करेल, असं ते म्हणाले.

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुशांतच्या मृत्यूचे राजकारण केलं जात असल्याचा गंभीर आरोपही केला. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही सुशांतच्या कुटुंबिय, चाहत्यांच्या भावना समजू शकतो. पण मी या सर्वांना एक विनंती करतो की आपण या विषयावर होत असलेल्या राजकरणाचा भाग बनू नका, असं ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुशांतच्या मृत्यूबद्दल राजकारण केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या बोलण्याच्या क्षमतेवर अविश्वास दाखविल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा या मुंबई पोलिसांमुळेच ते मुख्यमंत्री राहू शकले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईची लोकल कधी सुरु होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

कोरोनाच्या या संकटकाळात हे पोलिस आपले संरक्षण करीत आहे. जनतेच्या संरक्षणासाठी बर्‍याच पोलिसांनी आपले प्राण दिले आहेत आणि आपण आपल्या या पोलिसांवर संशय करतो. हे करणार्‍यांना लाज वाटली पाहिजे.  कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणारे पोलिसच आहेत, असं ते म्हणाले.