Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: नीट परीक्षा पेपरफुटी (NEET Paper Leak Case) आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janata Party) थेट संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिलेली. पण, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोर्चाच्या आदल्या दिवसापासूनच जंतर-मंतरवर (Jantar Mantar) बॅरिकेटिंग केलेलं. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काहींना ताब्यातही घेतलं. आंदोलन मोडीत काढण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. रक्त निघेपर्यंत आंदोलकांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. कित्येकांची डोकी फोडली, तर कित्येकांना वळ उठेपर्यंत झोडलं. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि देशभरात संतापाची लाट उसळली. अनेक सेलिब्रिटींनी मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. तर, कित्येकांनी सोशल मीडियावर व्यक्त होत निषेध व्यक्त केला. पण, एका मराठी अभिनेत्यानं मात्र, या प्रकरणात सरकारची बाजू घेतली आहे. मी सरकारविरोधी भूमिका कधीही घेणार नाही, असं म्हणत त्यानं माध्यमांशी बोलताना आपलं मत मांडलं आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर बोलताना अभिनेता सौरभ गोखलेनं स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशभरातून सेलिब्रिटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असताना, त्यानं मात्र, आपण सरकारच्या बाजूनं असल्याचं ठामपणे सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांसोबत आपली सहमती असल्याचं सांगत असतानाच, या आंदोलनाला काही जणांकडून राजकीय रंग दिला जात असल्याबद्दल आणि त्यात हिंदू धर्म, श्रीरामाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी अभिनेता सौरभ गोखले नेमकं काय म्हणाला? (Saurabh Gokhale On Student Protest)
अभिनेता सौरभ गोखले म्हणाला की, "मी सरकारविरोधी भूमिका कधीही घेणार नाही. कारण मला वाटतं अशी कुठलीही गोष्ट घडते तेव्हा फक्त सरकार जबाबदार नसतं. ज्या घटना घडल्या त्याला जबाबदार वेगळे लोक होते. त्या लोकांना अटक झालेली आहे. त्यांच्याबद्दल कारवाई करण्यातही प्रशासन कुठेही कमी पडलेलं नाही. पण, जे आंदोलन चाललंय..त्यामध्ये त्यांनी नक्कीच काही चांगल्या गोष्टी मांडल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी त्यांची इच्छा आहे".
"पण, त्याचबरोबर अशाही काही गोष्टी घडल्यात... हिंदू धर्माबद्दल अतिशय वाईट बोललं गेलं. श्रीरामांबद्दल वाईट बोललं गेलं... घोषणा दिल्या गेल्या. त्याला कुठला तरी वेगळा रंग दिला जातोय. तो कोणत्याही धर्माभिमानी हिंदूला कधीही पटणार नाही. तो मलाही तसा पटणार नाही. एखाद्या शिक्षणव्यवस्थेतील घोषणेसाठी तुम्ही उपोषण करणं याच्या मागच्या भावना समजू शकतो. पण, त्याच्यात कुठल्यातरी विचित्र गोष्टी यायला लागल्या आणि त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला की, त्या सगळ्या गोष्टी बघण्याकडे आणि फॉलो करण्यावरुन मन उठतं...", असं म्हणत अभिनेता सौरभ गोखले यानं स्पष्ट शब्दांत आपलं परखड मत मांडलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
