Jitendra Awhad on Chhaava Movie : विकी कौशलची (Vicky Kaushal) मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत ऐतिहासिक ‘छावा’ (Chhaava) चित्रपट शुक्रवारी (दि. 14) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छावा या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील हा चित्रपट पाहून कलाकारांचे कौतुक केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा आलेख असलेला 'छावा' सिनेमा आताच पाहिला. विकी कौशलचा अप्रतिम अभिनय, कलाकारांची उत्कृष्ट निवड, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चित्रिकरण, पटकथा- संवाद यामुळे हा सिनेमा खरंच छान झाला आहे. एक मात्र सत्य या सिनेमात दाखवलंय. ते म्हणजे, छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब कधीच हरवू शकला नसता. महाराष्ट्राला लागलेला शाप तेव्हाही जिवंत होता; तो म्हणजे गद्दारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर सातत्याने गद्दारी होत गेली ती छत्रपती संभाजी महाराजांच्या मरणापर्यंत! एकाही युद्धात औरंगजेब त्यांना हरवू शकला नाही. पण, अखेरीस स्वकियांनीच घात केला अन् संगमेश्वरला ते पकडले गेले.
महाराष्ट्राला गद्दारीने कायम शाप दिलाय
तिथे जर घात झाला नसता तर संगमेश्वरहून त्यांनी अकलूजला औरंगजेबाच्या छावणीवर चाल करून गेले असते अन् औरंगजेबाचा पराभव केला असता आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. पण, महाराष्ट्राला गद्दारीने कायम शाप दिला आहे की दुहीचे बिजे इथे पाषाणावरही उगवतात, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या