Zeenat Aman : आपल्या तारुण्याच्या काळात अभिनेत्री झीनत अमानने (Zeenat Aman) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्या देशालाच वेड लावले होते. तिची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक आतुर असायचे. रुपेरी पडद्यावरील अदांनी तिने लोकांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. चित्रपटांमध्ये नेहमीच आनंदी दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच वादळे आली.


लाखो लोकांच्या हृदयात राहणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अशी  एक घटना घडली. या घटनेचे ओरखडे आजही तिच्या मनात कायम आहे. झीनत अमानला एका चित्रपट निर्मात्याने बेदम मारहाण केली होती. एका पार्टीदरम्यान अचानकपणे अशा काही घडामोडी घडल्या, ज्याच्यामुळे अभिनेत्री रक्तबंबाळ झाली असल्याचे दिसून आले. डोळ्यांनाही इजा झाली होती. 






संजय खान आणि झीनत अमानचा विवाह...


अब्दुला या चित्रपटात झीनत अमान आणि संजय खान हे दोघेही लीड रोलमध्ये होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. जवळपास एक वर्ष या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्याच दरम्यान झीनत संजयच्या खूपच जवळ आली होती. त्याच दरम्यान झीनतने आपल्या तारखा या बी.आर. चोप्रा यांच्या चित्रपटासाठी दिलेल्या.


बी.आर. चोप्रा यांच्या इन्साफ का तराजू या चित्रपटात झीनत अमान ही लीड रोलमध्ये होती. अब्दुलाच्या चित्रीकरणानंतर झीनत लोणावळा येथे शूटिंगसाठी पोहचली होती. असे म्हणतात की, अब्दुलाच्या चित्रीकरणादरम्यान झीनतने संजयसोबत विवाह केला होता. संजय खानचे याआधीच लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं होती. तरीदेखील संजय यांनी झीनतसोबत दुसरा विवाह केला.


संजय खानने घेतला झीनतवर संशय... 


असे म्हणतात की,  झीनत ही  'इन्साफ का तराजू' या चित्रपटासाठी शूटिंग करत असताना संजय खानने तिला फोन केला. संजयने झीनतला सांगितले की, 'अब्दुल्ला'साठी आणखी काही दिवस शूट करायचे असेल तर तिने त्याला तारखा द्याव्यात. झीनतने त्याला समजावून सांगितले की तिने बीआर चोप्रा यांना त्या चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर तारखा दिल्या होत्या आणि आता जर तिने नकार दिला तर ते योग्य ठरणार नाही. संजयने ऐकले नाही आणि रागावून फोन कट केला.


यानंतर झीनत खूप काळजीत पडली आणि तिने याबाबत चोप्राशी चर्चा केली. काही वृत्तांनुसार, झीनतने चोप्राला सांगितले की तिला एक दिवसासाठी मुंबईला जायचे आहे, ती संजयला पटवून देईल आणि परत येईल अन्यथा ती या विचारात शूट करू शकणार नाही. चोप्राला हे प्रकरण समजले आणि त्यांनी पुन्हा लवकर येण्यास सांगितले. बी.आर. चोप्रा यांच्या सोबत झीनतचे सूत जुळले असल्यानेच तिला पु्न्हा यायचे नसल्याचा आरोप संजयने केला. 


यामुळे त्रस्त झालेल्या झीनतने तिच्या हेअरड्रेसरसह कारने मुंबई गाठली. झीनत थेट मुंबईत संजयच्या घरी गेली पण तो तिथे नव्हता. मग तिलाही,  संजय मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याची माहिती मिळाली. झीनतने विचार केला की ती संजयला भेटेल, त्याला समजवेल आणि परत लोणावळ्याला जाईल. झीनत जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा संजय त्याची पत्नी आणि काही मित्रांसोबत पार्टी करत होता.



झीनत त्याच्याकडे गेली आणि एकांतात काही गोष्टींची चर्चा करायचे असल्याचे म्हटले.  नशेत असलेल्या संजयने झीनतला दुसऱ्या खोलीत नेले आणि तिच्यावर राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार त्यांच्या खोलीतून झीनतच्या किंचाळण्याचा आवाज आला तेव्हा झीनतच्या हेअरड्रेसर तातडीने आवाज ऐकून त्यांच्या रुमकडे धाव घेतली. त्यावेळी संजय झीनतला बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. बऱ्याच प्रयत्नांनंतर हॉटेलच्या सिक्युरिटीने संजयला अडवले. पण तोपर्यंत झीनत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.


झीनत झाली होती गंभीर जखमी 


संजय जेव्हा झीनत अमानवर हल्ला करत होता तेव्हा झीनतच्या हेअरड्रेसरने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांना तिला वाचवण्यास सांगितले पण कोणीही त्या खोलीत गेले नाही. हॉटेलच्या रक्षकांनी झीनतची सुटका करून तिला रुग्णालयात नेले. झीनतवर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू झाले आणि डॉक्टरांनी सांगितले की तिचा जबडा तुटला असून उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. झीनतलाही मोठा धक्का बसला आहे. झीनत जवळपास 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिली आणि त्यानंतर ती मुंबईत तिच्या घरी आली.


झीनत यांनी कारवाई केली नाही


झीनतच्या कायदेशीर टीमने तिला संजयवर कारवाई करण्यास सांगितले, असे सांगितले जाते. ती मोठी अभिनेत्री असून तिला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे दाद मागितली. पण झीनत अमानने सांगितले की, तिचे संजयवर प्रेम आहे आणि ती असा विचारही करू शकत नाही. या प्रकरणावर त्यांनी कायदेशीर कारवाई केली नाही पण त्यानंतर त्यांनी संजय खानशी कधीही संबंध ठेवले नाहीत.