मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या तारखेबाबत पतंगबाजी सुरुच आहे. 'विरुष्का' इटलीमध्ये नाही, तर भारतात, तेही मुंबईतच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.


वांद्र्या्च्या फॅमिली कोर्टात जाऊन अनुष्काने स्वतः लग्नाच्या नोंदणीसाठी लागणारा फॉर्म आणल्याची माहिती आहे. पीपींगमून.कॉम या वेब पोर्टलने याबाबत रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे विराट-अनुष्काचं विवाहस्थळ आणि तारीख याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

येत्या शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्का लगीनगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

विराटचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सीके नायडू अंडर 23 सेमी फायनलमधून सुट्टी घेतल्यामुळे या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं जात आहे. शुक्रवारी पालमध्ये दिल्ली विरुद्ध तामिळनाडू सामना होणार आहे. मात्र दिल्ली संघाचे प्रशिक्षक असलेले राजकुमार शर्मा त्यापासून दूर राहिले आहेत.

विराट-अनुष्का लग्नाच्या बातम्या फक्त अफवा, अनुष्काच्या प्रवक्त्यांची माहिती


9 ते 11 डिसेंबर या कालावधीत कोहली आणि अनुष्का इटलीत विवाहबद्ध होतील, अशी माहिती होती. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचा दावा अनुष्काच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

येत्या 10 डिसेंबरपासून श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण  विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अति क्रिकेट आणि रोटेशन पॉलिसीमुळे विराट कोहलीला विश्रांती दिल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र विराटला लग्नासाठीच श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून मुक्त करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत.

विराट आणि अनुष्काने मान्यवर या कपड्यांच्या ब्रँडसाठी नुकतीच जाहिरात केली होती. या दोघांचं नातं आणि लग्नाची थीम यांचा सुरेख मेळ या जाहिरातीत घालण्यात आला आहे. लग्नाच्या वेळी पती-पत्नी एकमेकांना अनेक वचनं देतात. त्याच थीमवर आधारित विराट आणि अनुष्कानं मॉर्डन वचनं एकमेकांना दिली आहेत.

संबंधित बातम्या :

येत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न?

विराटचा लग्नासाठी ब्रेक, डिसेंबरमध्ये अनुष्कासोबत लग्न?

‘मी नेहमी तुझी काळजी घेईन…’, विराटचं अनुष्काला वचन