मुंबई : भारतीय संगीत जगतातील अनमोल हिरा ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद झहूर खैय्याम काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ते 92 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर जुहू येथील सुजॉय रूग्णालयात उपचार सुरु होते.


खय्याम यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि काल त्यांची प्राणज्योत मालवली. 1947 मध्ये फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. 'कभी-कभी' आणि उमराव जान या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले.

नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्या संगिताने अजरामर झाले. खय्याम यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी आणि फिल्मफेयर पुरस्कारावरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे.

50 च्या दशकात हिंदी सिनेमाचं संगीत रुजवण्यात आणि फुलवण्यात ज्या दिग्गज संगीतकारांचा वाटा होता त्यापैकीच खय्याम हे एक होते. खय्याम यांना पहिल्यांदा ब्रेक मिळाला फुटपाथ या सिनेमातून. 1953 साली आलेल्या सिनेमाची गाणी खय्याम यांनी संगीतबद्ध केली.