पुणे: आपल्याला बँक, मोबाईल कंपन्यांमधून फोन येतात. समोरुन हिंदी बोलतात तेव्हा तुम्ही मराठीच बोला. आपण आग्रहाने मराठी बोलू लागलो, तर मराठी मुलांनाही अशा हिंदी बोलणाऱ्यांच्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. त्यामुळे मराठीला प्राधान्य द्या. तिकडून हिंदी बोलल्यावर "बोलो क्या काम है म्हणू नका", अशी विनंती अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.


नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम' फाऊंडेशनला अभिजित कदम मेमोरिअल फाऊंडेशनचा अभिजित कदम मानवता पुरस्कार प्रदान करण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं.

यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले, "दैदीप्यमान इतिहास असणाऱ्या देशाचा वर्तमान एवढा केविलवाणा कसा? बँकांचे, मोबाईल कंपन्यांचे फोन येतात, पलिकडचे लोक हिंदी/इंग्रजीत बोलले तरी तुम्ही मराठीत बोला. त्यातून मराठी मुलांना रोजगार मिळेल"