मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्याने आपल्या अनुपस्थिती बाबत सांगताना, किरण रावसह आपल्याला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली.


आजारी असल्यामुळे या कार्यक्रमाला तीव्र इच्छा असतानाही उपस्थित राहत न आल्याबद्दल आमीरने खंत व्यक्त केली. मात्र त्याने कार्यक्रमासाठी स्वतःच्या जागी जाण्याची विनंती शाहरुख खानला केली आणि शाहरुखनेही तातडीने होकार दिला. त्यामुळे शाहरुख आजारी असलेल्या आमीरच्या मदतीला धावून गेला.

आमीरने स्वतः याबद्दल बोलताना माहिती दिली. आपण उपस्थित राहू शकत नसल्याने शाहरुखला आग्रह केला आणि त्याने तातडीने मान्यही केलं, असं त्याने सांगितलं.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल काल जाहीर करण्यात आले. यासाठी  पुण्यातल्या बालेवाडी इथे या सोहळ्याचं भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता शाहरुख खान, मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी, पानी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह अनेक मराठी कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धक गावांमधले अनेक लोक उपस्थित होते.