मुंबई : मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीत अशी तक्रार निर्मात्यांकडून नेहमीच ऐकायला मिळत असते. त्याही पुढे जाऊन थिएटर मिळाले तर प्रेक्षक नाहीत अशीही ओरड होते. खरं तर त्यामागची कारणं सगळ्यांनाच माहित आहेत, पण त्या कारणांवर विचार होताना मात्र अजिबात दिसत नाही. एकाच आठवड्यात सात सिनेमे रिलीज होणार असतील तर थिएटर मिळणार कुठून आणि प्रेक्षक येणार तरी कसे?


मागच्या आठवड्यात सात सिनेमे रिलीज करण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत या आठवड्यात फक्त एकच सिनेमा रिलीज झाला आहे. याला शुद्ध वेडेपणा म्हणायचं की आणखी काय?

आपला सिनेमा ज्या दिवशी रिलीज होतो, त्या दिवशी एकूण किती सिनेमे रिलीज होत आहेत? संख्या जास्त असेल तर आपण पुढच्या आठवड्यात रिलीज करु शकतो का? पुढच्या आठवड्यात किती आणि कोणते सिनेमे आहेत? एवढे साधे प्रश्न निर्मात्यांना पडू नयेत?

सिनेमात हिरोने घातलेल्या शर्टाला कोणत्या रंगाचं बटन असावं त्याच्या सुद्धा 'अभ्यास' करणाऱ्या या मंडळींनी रिलीजसारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाला इतकं किरकोळ घ्यावं हे खरंच भयंकर आहे.

मागच्या आठवड्यात सिनेमे रिलीज करणाऱ्या सात निर्मात्यांपैकी एकालाही 13 ऑक्टोबर ही तारीख दिसली नाही? या आठवड्यात 'वाक्या' नावाचा एकमेव सिनेमा रिलीज होतोय हे कळलं नाही? जर कळलं असेल तर मग त्यांनी आपला सिनेमा पुढे का ढकलला नाही? का मग इगो आडवा येतोय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

थोडक्यात सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. बॉलिवूडमध्ये जसं 'मिलजुलके खायेंगे' कल्चर दिसतं त्यातून मराठी इंडस्ट्री काहीच शिकलेली नाही असंच म्हणावं लागेल. हे सुधारण्याची अपेक्षा जवळ जवळ नाहीच. त्यामुळे निर्मात्यांनो तुम्ही तुमच्या खर्चाने सिनेमा बनवा, तुम्हाला जमेल तसा प्रमोट करा, तुमच्या सोईनुसार वाट्टेल तेव्हा रिलीज करा पण कृपा करुन प्रेक्षक येत नाहीत अशी ओरड अजिबात करु नका !