मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप एका एनआरआय दाम्पत्याने केला आहे. पनवेलमधील खान कुटुंबाच्या फार्महाऊस शेजारी तक्रारदार कक्कड दाम्पत्याच्या मालकीची जमीन आहे.


अनिता आणि केतन कक्कड यांनी 1996 मध्ये पनवेलमध्ये जमीन विकत घेतली होती. ही जमीन सलमान खानच्या फार्महाऊसच्या शेजारी आहे. जमिन खरेदीनंतर 18 वर्ष कक्कड दाम्पत्य अमेरिकेत राहत होतं. मात्र 2014 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांची पनवेलमधील जमिनीवर बंगला बांधण्याची इच्छा होती.

आपण अमेरिकेत असताना खान कुटुंबाला काहीही हरकत नव्हती, मात्र भारतात परतल्यानंतर त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा दावा कक्कड यांनी केला आहे. सलमान खानच्या लोगोचं गेट लावून आपल्याला प्लॉटवर जाऊ दिलं जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.



आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये विद्युत पुरवठा केला जातो, मात्र आपल्याच कुटुंबाला वीज पुरवली जात नसल्याचा दावाही कक्कड यांनी केला आहे. या प्रकरणी सलमान खानला कक्कड दाम्पत्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

'वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपण न्याय मागितला. त्यांनी आश्वासनही दिलं. मात्र काही दिवसांनी सलमान मुनगंटीवारांकडे डिनरसाठी गेला. त्यानंतर आपल्या प्रकरणावर सुनावणी झाली नाही' असा आरोपही कक्कड कुटुंबाने केला आहे.