जयपूर: काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खान जामीन मंजूर झाला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.


जोधपूर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर, कोर्ट ऑर्डर घेऊन खालच्या कोर्टात म्हणजेच ज्या कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावली त्या कोर्टात जावं लागेल. मग ते कोर्ट सुटकेचा आदेश देईल. त्यानंतर सलमान जेलबाहेर येऊ शकेल. या संपूर्ण प्रक्रियेला किमान 2 तास लागू शकतात.

सलमानला दोन अटींवर जामीन

सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.

सलमानच्या घराबाहेर जल्लोष

सलमान खानला जामीन मिळाल्याची माहिती मिळताच, मुंबईत त्याच्या घराबाहेर तळ ठोकून बसलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सलमानची एक झलक पाहण्यासाठी काही चाहते दोन दिवसांपासून त्याच्या घराबाहेर बसले आहेत.

दोन्ही वकिलांचा युक्तीवाद
सलमानच्या जामीन अर्जावर कोर्टात आज सकाळी 10.30 वा. पासून दोन्ही पक्षाचा वकिलांचा युक्तीवाद सुरु झाला. सलमानच्या वकिलांनी जामीनासाठी पूर्ण दावा केला. तर सरकारी आणि बिष्णोई समाजाच्या वकिलांनी सलमानच्या जामीनाला तीव्र विरोध केला. सुमारे 2 तास हा युक्तीवाद सुरु होता. त्यानंतर कोर्टाने ब्रेक घेऊन, दुपारी 3 वा. सलमानला जामीन मंजूर केला.

जोधपूर न्यायालयात सलमानच्या वकिलांसोबत त्याची बहीण अल्विरा, अंगरक्षक शेरादेखील उपस्थित होते.

न्यायाधीशांची बदली

सलमानच्या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे. न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह 87 न्यायाधीशांची बदली झाली आहे. ही नियमित बदली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमानच्या जामीनावरील सुनावणीचं संकट होतं. मात्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी सुनावणी घेत, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर दुपारी निर्णय दिला.

सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद

जोधपूर सेशन कोर्टानं काल सलमानच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय न देता, त्याची सुनावणी उद्यावर म्हणजे शनिवारवर ढकलली. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी सलमान खानच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला.

शिकारीसाठी सलमाननं जी कार वापरली, ती नेमकी कुठून जप्त केली, याबाबत अनेक शंका असल्याचं दावा सलमानच्या वकिलांनी केला. या आधारावर सलमानच्या जामीनाची मागणी केली. मात्र कोर्टानं याबाबतची सुनावणी शनिवारी होणार असल्याचं जाहीर केल्यानं, सलमानला शुक्रवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागली.

सलमानला 5 वर्षांची शिक्षा

20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी  दोषी ठरलेल्या अभिनेता  सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवारी 5 एप्रिलला जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं.

शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय आहे?

काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.

यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.

संबंधित बातम्या

काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड


 सलमानसाठी एक न्याय, अन् इतर कैद्यांना वेगळा न्याय!


सलमान न जेवता रात्रभर जमिनीवर झोपला


 निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!


...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!


काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड


सलमानच्या जेलवारीमुळे 'या' अभिनेत्रीला आनंद!