प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सलमानचा 'भारत' घसरला, कमाईत घट
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2019 12:27 PM (IST)
बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (ईदच्या दिवशी) चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला खरा. परंतु प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. ईद आणि सलमानचा चित्रपट एक समीकरणच झालं आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला सलमानचा चित्रपट हमखास हिट होतोच. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (ईदच्या दिवशी) चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला खरा. परंतु प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या या चित्रपटाने बुधवारी त्याच्याच जुन्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. 'भारत' हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 'भारत'ने पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई केली. परंतु प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशीच्या कमाईत तब्बल 11.30 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ईदच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे चित्रपटाने चांगली कमाई केली. परंतु गुरवारी वर्किंग डे असल्यामुळे कमाईत घसरण झाल्याचे बोलले जात आहे. परंतु शनिवारी-रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा सिने व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाहा कसा आहे चित्रपट : REVIEW : भारत - सलमान.. सलमान आणि फक्त सलमान!! 'भारत' चित्रपटात सलमान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे. यामध्ये तरुण सर्कस चॅम्पियनपासून ते 60 वर्षाच्या व्यक्तीरेखेत सलमान दिसणार आहे. सिनेमात सहा दशकांचा एका व्यक्तीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान सहा विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ हे देखील झळकणार आहेत. Bharat Movie | प्रेक्षकांना कसा वाटला सलमान खानचा 'भारत'? | एबीपी माझा अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अली अब्बास जफरने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.