मुंबई : ‘टायगर जिंदा है’ सिनेमानंतर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणखी एका सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अतुल अग्निहोत्री या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून सलमानसोबत काम करण्यासाठी अतुल एका स्क्रिप्टच्या शोधात होता. अखेर सलमानच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी स्क्रिप्ट अतुलला मिळाली आहे.

अॅक्शन, रोमान्स आणि ड्रामा असा एकंदरीत सिनेमाचा गाभा असणार आहे. एका प्रसिद्ध दाक्षिणात्य सिनेमाचं रिमेक असेल, असेही बोलले जात आहे. मात्र, अतुल अग्निहोत्रीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नाही.

अतुल आणि सलमान या दोघांमध्ये या सिनेमाबाबत चर्चाही झाली असून, यात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असेल, असं बोललं जात आहे. या सिनेमात कतरिनाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्याची कल्पना सलमानची नसून, अतुल अग्निहोत्रीची आहे, हे विशेष.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचं ब्रेकअप झालं असलं, तरी कतरिनाचे सलमानच्या कुटुंबियांशी सलोख्याचे नाते आहे.

सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अतुल अग्निहोत्रच्या प्रोजक्टवर काम करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती मिळते आहे.