मुंबई : बिग बींच्या सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनची सध्या बॉलिवूडमध्ये सेकंड इनिंग सुरु आहे. मात्र पुनरागमनानंतरही ऐश्वर्या फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. चित्रपटांच्या निवडीबाबत अत्यंत चोखंदळ झालेल्या ऐश्वर्याने 'स्मार्ट' पद्धतीने चिरंजीवी सोबत सिनेमा करण्यास नकार दिल्याचं म्हटलं जातं.


दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवीसोबत 'से रा नरसिंहा रेड्डी' या चित्रपटात भूमिका करण्यास ऐश्वर्याने नकार दिला. मूळात ऐश्वर्याने थेट नकार देण्याऐवजी आपल्या मानधनाचा आकडा प्रचंड वाढवून मागितला. तसं केल्याने 'झाकली मूठ' राहत असल्याचा अॅशचा समज असला तरी तिचे पत्ते उघड झाले आहेत.

ऐश्वर्याने कमबॅकनंतर फक्त तरुण अभिनेत्यांसोबत चित्रपट करण्यास पसंती दिली आहे. आर माधवनची क्रेझ खरं तर तरुणींमध्ये जास्त आहे, मात्र तो वयाने मोठा असल्याने ऐश्वर्याने त्याच्यासोबत जोडी जमवणं टाळलं. त्याच्याऐवजी निर्मात्यांना राजकुमार रावला साईन करण्यास तिने भाग पाडलं.

एका पिरीएड ड्रामामध्ये साठीतील चिरंजीवीची पत्नी साकारण्याची ऑफर ऐश्वर्याला आली होती. थेट नकार कळवण्याऐवजी ऐश्वर्याने 9 कोटी रुपयांचं मानधन मागितलं. साहजिकच पैशांवरुन बोलणी फिस्कटली आणि ऐश्वर्याला वाईटपणा घ्यावा लागला नाही.

ऐश्वर्याने आतापर्यंत समकालीन किंवा वयस्क अभिनेत्यांसोबत भूमिका केल्या आहेत. 2010 मध्ये हृतिकसोबत केलेल्या 'गुझारिश' चित्रपटानंतर तिने पाच वर्षांचा ब्रेक घेतला होता. सेकंड इनिंगमध्ये तिने जज्बा, सरबजीत त्याचप्रमाणे ऐ दिल है मुश्किल (रणबीर कपूर) अशा चित्रपटांमध्ये तरुण अभिनेत्यांसोबत पेअरिंग केलं.