मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, निर्माती अनुष्का शर्माला चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या फाळकेंच्या नावे दिला जाणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे.


निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनुष्काला हा सन्मान मिळणार आहे. प्रोड्युसर म्हणून वेगळ्या धाटणीच्या कथा, प्रयोगशील कल्पना हाताळल्याबद्दल अनुष्काच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

'एनएच 10' या चित्रपटातून अनुष्काने चित्रपट निर्मितीच्या क्षेतात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर फिलौरी, परी यासारख्या चित्रपटांची निर्मिती तिने केली. या तिन्ही चित्रपटांत अनुष्काच मुख्य भूमिकेत झळकली होती.

अनुष्काने भाऊ कर्णेश शर्मासोबत 'क्लीन स्लेट फिल्म्स' अंतर्गत चित्रपटांची निर्मिती केली आहे.

'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अनुष्का शर्माने बँड बाजा बारात, जब तक है जान, पीके, सुलतान, ऐ दिल है मुष्किल यासारख्या अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

सुपरस्टार म्हणून यशाच्या शिखरावर असताना तिने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. दर्जेदार कथानक आणि मनोरंजन यांची सांगड घालत तिने प्रेक्षकांना चांगले सिनेमे दिले. नवोदित कलाकारांना तिने चित्रपटातून मोठा ब्रेक दिला, याची दखल घेत तिला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

गेल्याच वर्षी अनुष्का क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकली होती. लग्नानंतर दोघांचंही करिअर सुसाट वेगाने सुरु आहे.