मुंबई : येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या 'केदारनाथ' चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदूं धर्मातील सर्वोच्च स्थान असलेल्या चारधामांपैकी एक असलेल्या पवित्र अशा 'केदारनाथ' या नावाने लव्हस्टोरीवर आधारित सिनेमा कसा काढला जातो? असा सवाल करत या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. अॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अॅड. प्रभाकर त्रिपाठी यांच्यावतीने ही याचिका बुधवारी हायकोर्टात सादर करण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली.


सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचं पुन्हा परीक्षण करावं, तोपर्यंत सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असू शकते, असा दावा सीबीएफसीतर्फे करण्यात आला आहे. आम्ही या चित्रपटाचं परीक्षण केलेलं असून त्यात काहीही आक्षेपार्ह नाही, असा दावा सीबीएफसीने हायकोर्टात केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण होत आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हायकोर्टाने गुरुवारी या प्रकरणावर तातडीने सुनावणी ठेवली आहे.