Pankaj Dheer Passed Away: टीव्ही आणि बॉलिवूड जगतात आज शोककळा पसरली आहे. ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer) यांचं बुधवारी 68 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी ‘महाभारत’, ‘चंद्रकांता’ यांसारख्या मालिकांमधील दमदार अभिनयामुळे घराघरात लोकप्रियता मिळवली होती. पण त्यांच्या कुटुंबाने एक काळ असा अनुभवला होता, जेव्हा एका वचनामुळे सर्व काही गमावावं लागलं होतं. हे वचन त्यांच्या वडिलांनी प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांना दिलं होतं. (Geeta Bali)
गीता बालीचं वचन आणि धीर कुटुंबावरचं संकट
पंकज धीर यांचे वडील सी.एल. धीर हे दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यांनी बहू बेटियां, बसेरा, आखिरी रात आणि जिंदगी यांसारख्या चित्रपटांवर काम केलं होतं. 1965 साली ते रानो नावाचा चित्रपट बनवत होते, ज्यात धर्मेंद्र आणि गीता बाली मुख्य भूमिकेत होते. चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता, फक्त गीता बालींचा तीन दिवसांचा शूट बाकी होता.
दरम्यान, गीता बाली पंजाबमध्ये शूटिंगदरम्यान देवीने (Small Pox) आजारी पडल्या. त्यांना मुंबईत आणून उपचार सुरू करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मृत्यूपूर्वी गीता बाली यांनी सी.एल. धीर यांना एक वचन द्यायला सांगितलं होतं, “माझ्या जाण्यानंतर हा चित्रपट पूर्ण करू नका.” धीर यांनी ते वचन पाळलं आणि चित्रपट अपुराच ठेवला.
दिलीप कुमारांचा सल्ला आणि घेतलेला कठोर निर्णय
दिलीप कुमार आणि मीना कुमारी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सी.एल. धीर यांना चित्रपट पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. दिलीप साहेबांनी तर गीता बालींच्या भूमिकेसाठी मीना कुमारीचं नावही सुचवलं होतं. मात्र, सी.एल. धीर यांनी वचन मोडण्यास नकार दिला. परिणामी त्यांचे सर्व गुंतवलेले पैसे गेले, आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडलं.
पंकज धीर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या काळानंतर त्यांचे वडील फार एकटे पडले आणि घरावर आर्थिक अडचणींचं ओझं आलं. त्यामुळे पंकज धीर यांनी अतिशय लहान वयात काम करण्यास सुरुवात केली, जेणेकरून कुटुंबाचा खर्च भागवता येईल. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं, पण प्रेक्षकांच्या मनात ते ‘महाभारत’मधील कर्ण म्हणून आजही आजरामर आहेत.
हेही वाचा