फक्त प्रभासला माहितेय 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं'!
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2016 11:32 AM (IST)
मुंबई : 'बाहुबली' हा सिनेमा पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारलं? गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडलेच शिवाय यंदाचं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळही मिळवलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हा प्रश्न गेल्या वर्षापासून सोशल मीडियावर चर्चेत होता. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात याचं उत्तर मिळणार असून या सीनचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं. विशेष म्हणजे या सीनबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली आहे. प्रभासने या सीनचं शूट केलं त्यावेळी सेटवर कोणालाही येण्याची परवानगी नव्हती. दिग्दर्शक राजमौली यांना 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' हे गुपित राखायचं असल्यामुळे त्यांनी चित्रपटातील इतर कोणत्याही कलाकारासोबत हे कथानक शेअर केलेलं नाही. प्रभास या सीनचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे आता राजमौली यांच्या व्यतिरिक्त फक्त प्रभासला हे गुपित माहित झालं आहे. बाहुबली 2 चित्रपटातील अशी अनेक गुपितं आहेत, जी फक्त राजमौली यांनाच माहित आहेत. मात्र 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं' याचं उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर प्रभासला गाठा आणि गुपित उलगडण्याचा प्रयत्न करा.