मुंबई : तनुश्री दत्ताने लावलेल्या आरोपांवर अभिनेते नाना पाटेकर यांनी अखेर मौन सोडलं आहे. "2009 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं होतं," असा आरोप माजी मिस इंडिया तनुश्री दत्ताने केला होता.


या मुद्द्यावर बोलताना 67 वर्षीय नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, "ती असं का करतेय, यावर मी काय बोलू शकतो? ती असं का बोलतेय हे मला कसं माहित असणार? लैंगिष शोषण म्हणजे तिला नेमकं काय म्हणायचं आहे? सेटवर माझ्यासोबत 50 ते 100 लोक होते."

नाना पाटेकर पुढे म्हणाले की, "मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. पण हे सगळं मीडियाला सांगून काहीही उपयोग नाही, कारण तुम्ही काहीही छापाल. ज्यांना जे बोलायचंय ते बोलू दे, मी माझं काम करत राहणार."

अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे."

'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला.