'कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, पण मुंबईकर ट्रॅफिकचे नियम का पाळत नाही?'
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2017 08:39 AM (IST)
मुंबई : मुंबईकरांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 'बाहुबली-2'च्या फिव्हरचा फायदा घेत मुंबई पोलिसांनी ट्वीटरवर दोन सवाल उपस्थित केले आहेत. बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागात 'कट्टाप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नानं अनेकांना डोकं खाजवायला लावलं होतं. सोशल मीडियातही या प्रश्नानं अनेक मेसेज व्हायरल होत होते. त्याचं उत्तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात देण्यात आलं आहे. हे जाणून घेण्यासाठी सिनेरसिकांनीही चित्रपट गृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. याचाच वापर करुन मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या समस्यांबाबत जनजागृती मोहीम सुरु केली आहे. मुंबई पोलिसांनी यासाठी ट्वीट केले असून, या ट्वीटमध्ये 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' असा सवाल विचारला आहे. तसेच 'मुंबईकर नागरिक ट्रॅफिक नियमांचं पालन का करत नाहीत?' असा दुसरा सवाल मुंबईकरांना विचारण्यात आला आहे. बाहुबलीचा हॅशटॅग वापरुन केलेलं हे ट्वीट काही तासातच चांगलंच व्हायरल झालं आहे. दरम्यान, बाहुबली-2 ला सिनेरसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा रिलीज होऊन दोनच दिवस झाले आहेत. पण या सिनेमाने गेल्या दोन दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. फिल्म अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहिती नुसार, ‘बाहुबली 2’ सिनेमाने जगभरात पहिल्याच दिवशी 201 कोटींचा गल्ला जमवला आहे. संबंधित बातम्या ‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं.. अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स ! ‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया