मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका मुबारक बेगम यांचं वृद्धापकाळानं मुंबईत निधन झालं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी जोगेश्वरीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.


 
मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. या आजारपणातच त्यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होतील.

 
बेगम यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षा त्या मुंबईत आल्या. मुबारक बेगम यांनी 1950 ते 1970 असा दोन दशकांचा काळ आपल्या आवाजानं गाजवला.

 
1955 मधील दिलीपकुमारच्या देवदास मधलं 'वो ना आयेंगे पलटकर', 1961 सालच्या हमारी याद आयेगी या चित्रपटातील 'कभी तनाहाईयो मे यू हमारी याद आयेगी' ही गाणी प्रचंड गाजली होती. त्यांच्या आवाजातील सोलो गाणी, गझल चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिल्या.