World Cup Final Kriti Sanon Emraan Hashmi : रोहित शर्माच्या भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येत आहेत. आता 'टायगर 3'च्या (Tiger 3) सक्सेस पार्टीत क्रिती सॅनन (Kriti Sanon) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांनी विश्वचषकाच्या फायनलबद्दल भाष्य केलं आहे. 


भारत आज चांगली कामगिरी करुन विश्वचषक जिंकेल : कृती सेनन


एबीपीला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सॅनन म्हणाली,"संपूर्ण विश्वचषकात भारताने चांगली कामगिरी केली आहे. आजही भारत चांगली कामगिरी करुन विश्वचषक जिंकेल अशी आशा आहे. कुटुंबियांसोबत मी घरीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनलचा आनंद घेणार आहे. आम्ही प्रत्येकजण टीम इंडियाचा जयजयकार करणार आहोत". 


क्रिती सॅनन पुढे 2011 मधील विश्वचषक फायनलबद्दल म्हणाली,"2011 च्या विश्वचषकादरम्यान मी राहायला दिल्लीला होते. त्यावेळी तेथील रहिवाशांनी एक मोठा प्रोजेक्टर लावून सामना पाहिला होता. त्यावेळी कुटुंबियांसह जल्लोष करत मी सामना पाहिला. भारत यंदा खूप चांगला खेळ खेळत आहे. त्यामुळे ट्रॉफी भारताकडेच येईल". 


बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 2003 च्या विश्वचषकाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत रंगला होता आणि आता यंदाच्या हंगामातील शेवटचा आणि निर्णायक सामना सुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये उपांत्य फेरीत प्रवास संपला होता. 


आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. बॉलिवूडमध्ये क्रिकेटवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली असून हे सिनेमे क्रिकेटप्रेमी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यात लगान (Lagaan), 83, शाबास मिट्ठू (Shabaash Mithu) अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या


Bollywood Cricket Movies : 'लगान', 'इकबाल' ते '83'; क्रिकेटवर आधारित हे सिनेमे तुम्ही पाहिलेत का?