मुंबई : लवकरच अभिनेत्री कंगना रनौतच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: कंगना करणार आहे. या सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. नुकतंच तिने याबाबत माहिती दिली आहे.


कंगना रनौत हिचा मणिकर्णिका हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केल्याचा दावा कंगनाने केला होता. दिग्दर्शक क्रिश यांनी अर्ध्यात या सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं होतं. त्यांनतर उर्वरीत सिनेमाचं दिग्दर्शन कंगनाने केल्याचा दावा होता.

यानंतर तिच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार असल्याची माहिती तिने दिली आहे. शिवाय हा सिनेमा प्रचारासाठी बनवण्यात येणार नसल्याचं कंगनाने सांगितलं. तिच्या जीवनावर आधारित सिनेमाची पटकथा बाहूबली सिनेमाचे पटकथा लेखक के.वी. विजयेंद्र यांनी लिहिली आहे. मणिकर्णिका या सिनेमाची पटकथाही त्यांनीच लिहिली होती.

कंगना तिच्या जीवनावर आधारित सिनेमाबाबत बोलताना म्हणाली की, माझ्या जीवनावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन मी करणार आहे. हा सिनेमा मी प्रचारासाठी बनवत नाही. माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्याबाबत कधी भेदभाव केला नाही. मी आहे तशी मला त्यांनी स्विकारलं, असं कंगना म्हणाली.