मुंबई : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर ठसा उमटवलेला बॉलिवूडपट 'क्वीन'चा दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर 'क्वीन' अभिनेत्री कंगना रनौतने मौन सोडलं आहे. आरोपांची दुसरी बाजूही पडताळायला हवी, असं म्हणत कंगनाने विकासला पाठिंबा दर्शवला आहे.


'फँटम मूव्हिज'मधील एका महिला कर्मचाऱ्याने विकास बहलवर गेल्या आठवड्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. गेल्या दीड वर्षांपासून विकास अत्याचार करत असल्याचा दावा तिने केला आहे. विशेष म्हणजे फँटममधील इतर भागीदार- मधू मँटेना, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी बहलसोबत संबंध तोडले आहेत.

'ज्या कोणावर लैंगिक अत्याचार होत असतील, त्यांनी पुढे येऊन त्याला वाचा फोडायला हवी. पीडितांच्या कुटुंबीयांनी, सहकाऱ्यांनी त्यांना बोलण्याचं बळ द्यावं. त्यांनी कोणतीही शरम बाळगण्याची गरज नाही. अर्थात, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याही ध्यानात घ्यायला हव्यात. त्यामुळे प्रत्येकाने बोलायला हवं, ते चूक असो की बरोबर.' अशा शब्दात कंगनाने विकासला एकप्रकारे पाठिंबा दर्शवला आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरसोबत झालेल्या वादामुळे कंगना चर्चेत आली होती. करणवर तिने कंपूशाहीचा आरोप केला. चिडलेल्या करणने 'इतकंच असेल तर बॉलिवूडमधून चालती हो' असा इशारा दिल्यानंतर 'बॉलिवूड काय तुझ्या बापाची जहागिर नाही' या शब्दात कंगनाने त्याला ठणकावलं होतं.