मुंबई : बॉलिवूडमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठी चर्चेत आहे. आता तिने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपलं करिअर संदर्भात भाष्य करुन, सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 'माझं करिअर संपलं, तरीही आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नसल्याची,' भावना व्यक्त केली आहे. तसेच तिने आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये प्रचंड आत्मविश्वास कमावल्याचेही तिने यावेळी सांगितलं.


पीटीआयला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत कंगना म्हणते की, ''मी माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या मनातल्या भीतीवर विजय मिळवला. तसेच स्वत:चं मुल्यमापन करण्याचा प्रयत्न केला. आज मला आनंद आहे की, मी स्वत: ला, स्वत:च्या व्यवहाराला, एक महिला म्हणून स्वत: मधील क्षमतांना जाणू शकले. मला जेव्हा समजतही नव्हतं, त्या वयाच्या 15 व्या वर्षात मी माझं घर सोडलं. पण आज वयाच्या 30 व्या वर्षी मी आता स्वत: ला ओळखू शकले.''

ती पुढे म्हणाली की, ''सध्या माझ्या मनात मी काहीतरी कमावल्याची भावना आहे. मला तीनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच बॉक्स ऑफिसवरही माझ्या सिनेमांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळे माझा प्रवास इथंच संपला, तरी माझ्याकडे आता गमावण्यासारखे काही नाही. आता उर्वरित आयुष्यात मी माझ्या यशाबद्दल सर्वांना सांगू शकते.''

मनातल्या भीतीवर बोलताना कंगना म्हणाली की, '' आज मला भीती कशाची वाटली पाहिजे? कारण, मी जेव्हा घर सोडलं, तेव्हा मला स्वावलंबी बनायचं होतं. पण आता मी मेगास्टार आहे. मी एक अशी महिला आहे, जी स्वत: ला पूर्णपणे ओळखते. अन्, एका महिलेसाठी हे मोठं आव्हान असतं. त्यामुळे आता जर मी घाबरले, तर मी आयुष्यभर भीत-भीतच जगेन.''

दरम्यान, या मुलाखतीत बोलताना तिने भविष्याविषयी प्लॅनिंग केलं असल्याचंही जाणवत होतं. ती म्हणाली की, ''मी मनालीमध्ये एक सुंदरसं घर घेतलं आहे. मला आता तिथं राहायचं आहे. पुस्तक लेखन करायचं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचीही माझी इच्छा आहे.''

दुसरीकडे कंगनाने नुकत्या 'आप की आदालत' या टीव्ही शोमध्ये हृतिक रोशन, केतन मेहता, आदित्य पंचोली आदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर हृतिकच्या समर्थनार्थ त्याची घटस्फोटीत पत्नी सुजैन खान उभी राहिली होती. यावरुनही कंगनाने आपलं मत मांडलं. ती म्हणाली की, ''सध्या मी यावर कोणतंही वक्तव्य करणार नाही. कारण यासंदर्भात माझं काही देणं-घेणं नाही.''

दरम्यान, हंसल मेहता दिग्दर्शित कंगनाचा आगामी सिनेमा सिमरन येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

संबंधित बातम्या

कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री