मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने आज वयाच्या 54 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. 14 मार्च 1965 रोजी जन्मलेला आमीर खान आज 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे.


आपल्या अभिनयाच्या जोरावर आमीरने बॉलिवूडसह सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख जपली आहे. रिल लाईफमध्ये अत्यंत प्रोफेशनल असलेला आमीर, रिअल लाईफमध्ये मात्र अत्यंत संवेदनशील आहे. त्याची प्रचिती आपल्याला त्याच्या ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून आली आहे.

सध्या आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात आमिरसोबत  अमिताभ बच्चन, कटरिना कैफ आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत.

आमीरचं 54 व्या वर्षात पदार्पण

आमीर खान आज वयाच्या 54 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आमीरने चॉकलेट हिरो म्हणून  करिअरची सुरुवात केली. आमीर सिनेमांबाबत अत्यंत चोखंदळ आहे. वर्षातून एकच सिनेमा करणं ही त्याची खासियत आहे. त्यामुळेच चाहते त्याच्या सिनेमाची अक्षरश: वाट पाहात असतात.

सध्या आमीर आपलं वर्षातून एकच सिनेमा हे सूत्र बदलताना दिसत आहे. त्यामुळेच दंगलनंतर सिक्रेट सुपरस्टार हे सिनेमे ठराविक अंतराने रिलीज झाले.

घरातूनच वारसा

आमीर खानला घरातूनच सिनेजगताचा वारसा मिळाला. वडील ताहीर हुसैन हे निर्माते तर चुलते नासिर हुसैन हे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यामुळे आमीरला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला.

आमीरचं करिअर

आमीरने 1973 मध्ये ‘यादों की बारात’ या सिनेमात बाल कलाकाराची भूमिका साकारात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आमीर बॉलिवूडमध्ये उठून दिसलो तो ‘कयामत से कयामत तक'(1988) मधील भूमिकेमुळे. या सिनेमाने त्याला ओळख दिली. त्याला सर्वोत्तम नवोदित कलाकार म्हणून पुरस्कारही मिळाला.

1996 मध्ये आलेला ‘राजा हिंदुस्थानी’ हा आमीरच्या करिअरमधील हिट सिनेमा होता. त्या सिनेमाने आमीर खानला सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार मिळवून दिला.

‘दिल’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘अंदाज अपना अपना’, रंगीला, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘इश्क’, ‘गुलाम’, ‘सरफरोश’, ‘मन’, ‘अर्थ’, ‘मेला’, ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘मंगल पांडे: द राइजिंग’, ‘रंग दे बसंती’, ‘फना’, ‘तारे जमीं पर’, ‘गजनी’, ‘थ्री इडियट्स’, ‘धोबीघाट’, ‘तलाश’, ‘धूम 3’ ‘पीके’, 'दंगल'  आणि सिक्रेट सुपरस्टार या सिनेमातून आमीरचा सशक्त अभिनय पाहायला मिळाला.

निर्माता आमीर खान

आमीर खानने अभिनयाशिवाय निर्माता आणि दिग्दर्शनही केलं आहे. आमीरने 2001 मध्ये आमीर खान प्रोडक्शन ही कंपनी सुरु केली. या कंपनीने पहिलाच हिट सिनेमा दिला, तो होता लगान. लगान या सिनेमाची सर्वोत्तम विदेशी भाषा फिल्म म्हणून 74 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारताकडून निवड झाली होती.

आमीर खानने तारे जमीन पर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. तर ‘जाने तू या जाने ना’, ‘पीपली लाइव’, ‘धोबी घाट’, ‘देल्ही बेल्ली’ आणि तलाश’ या सिनेमाची निर्मिती केली.

सत्यमेव जयते

आमीरने 2012 मध्ये  सत्यमेव जयते या शो च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एण्ट्री केली. या शोच्या माध्यमातून त्याने देशातील सामाजिक मुद्दे ठोसपणे मांडून त्यांना वाचा फोडली.

पानी फाऊंडेशन

आमीर खान सध्या महाराष्ट्रात पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी लढा देत आहे. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून त्याने अनेक गावं दुष्काळमुक्त केली आहेत.

नेहमीच सामाजिक भान राखत, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आमीर सध्या महाराष्ट्रात दुष्काळाशी दोन हात करत आहे. आमीरच्या या संवेदनशीलतेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. निस्वार्थपणे समाजासाठी झटणाऱ्या या मिस्टर परफेक्शनिस्टला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!