मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि दिवंगत अभिनेते कादर खान या जोडीने हिंदी सिनेसृष्टीला अनेक हिट आणि मनोरंजक चित्रपट दिले आहेत. गोविंदा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा. असे खुद्द गोविंदानेच अनेकदा सांगितले आहे. परंतु गोविंदाने कादर खान यांची तब्येत बिघडल्यानंतर कधीही त्यांना फोन केला नाही, असा आरोप कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने केला आहे.


इंडो एशियन न्यूज सर्व्हिसशी बोलताना सरफराज खान म्हणाला की, ‘गोविंदा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा, त्याच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीमध्ये कादर खान यांचे मोठे योगदान आहे. असे गोविंदा म्हणतो, परंतु माझे वडील आजारी असताना गोविंदाने एकदाही त्यांना फोन केला नाही. वडिलांच्या निधनानंतरही गोविंदाने आम्हाला फोन केला नाही.

कादर खान यांच्या निधनाची माहिती मिळताच गोविंदाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. त्यामध्ये गोविंदाने म्हटले होते की, ते (कादर खान) माझे उस्तादच नव्हते तर माझ्यासाठी ते माझ्या वडिलांसमान होते. त्यांच्या परिसस्पर्शाने त्यांनी अनेक सामान्य कलाकारांना सुपरस्टार बनवले. त्यांच्या जाण्याने मी खूप काही गमावले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी इतकीच प्रार्थना मी करतो’

परंतु प्रत्यक्षात गोविंदाने कादर खान यांच्या तब्येतीची कधीही विचारपूस केली नव्हती. असा आरोप कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने केला आहे.