रांची : झारखंड उच्च न्यायालयाने अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना दिलासा दिला आहे. छोटे सरकार या चित्रपटातील 'एक चु्म्मा तू मुझको उधार दे दे, चाहे बदलेमे यूपी-बिहार ले ले'. या गाण्याच्या शब्दांवर आक्षेप घेत बाल मुकुंद तिवारी यांनी तक्रार दाखल केली होती.


गोविंदा आणि शिल्पा शेट्टी यांचा 1996 मध्ये छोटे सरकार हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामधील या गाण्यावर आक्षेप घेत बाल मुकुंद तिवारी यांनी झारखंडमधील पाकुड जिल्हा न्यायलयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा न्यायालयाने गोविंदा आणि शिल्पा शेट्टी यांना समन्स जारी केला होता.

मात्र समन्स जारी केल्यानंतरही गोविंदा आणि शिल्पा कोर्टात हजर झाले नव्हते. त्यामुळे कोर्टाने दोघांविरोधात वॉरंट जारी केला होता. याच कारवाईच्या विरोधात दोघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने कनिष्ठ कोर्टाची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे गोविंदा आणि शिल्पा शेट्टींना दिलासा मिळाला आहे.

वकील अभय कुमार मिश्र यांनी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीची बाजू मांडली. हे गीत फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आले होते. हे गीत गोविंदा आणि शिल्पाने लिहिलं नसून त्यावर फक्त अभिनय केला आहे, असं वकील अभय कुमार मिश्रा म्हणाले.