मुंबई : ज्येष्ठ नाटककार, अभिनेते, लेखक, विचारवंत गिरीश कर्नाड यांचे आज निधन झालं. भारतीय साहित्यसृष्टी आणि मनोरंजनविश्व शोकसागरात बुडालं आहे. कर्नाड यांनी केवळ दाक्षिणात्य नव्हे, तर हिंदी, बंगाली, मराठी नाट्य, सिनेसृष्टीत काम केलं आहे. मराठीमध्ये गाजलेला जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपट सर्वांना आठवत असेलच. पण मराठीत केलेला त्यांचा हा प्रदर्शित झालेला एकमेव चित्रपट असला तरी तो त्यांचा अभिनय केलेला एकमेव चित्रपट नाही. काही वर्षांपूर्वी त्यांनी आणखी एका मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे सरगम. चित्रिकरण पूर्ण होऊनही हा चित्रपट सध्या सेन्सॉरच्या कात्रीत अडकला आहे.


या चित्रपटात गिरीश कर्नाड मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह दिशा परदेशी ही अभिनेत्रीही या सिनेमात दिसते. शिव कदम दिग्दर्शित या चित्रपटात कर्नाड मुख्य भूमिकेत आहेत. एक अत्यंत श्रीमंत उद्योगपती काही कारणाने सगळी व्यवहार, संपत्ती सोडून जंगलात निघून जातो आणि तिथे नव्या जगण्याचा शोध घेतो असे काहीसं याचं कथानक आहे. कर्नाड यांच्या जाण्याने सरगम चित्रपटाच्या टीमलाही धक्का बसला आहे. गेले काही महिने ते श्वसनाच्या विकारांनी आजारी होते याची कल्पना या टीमला होतीच. पण त्यातून ते बरे होतील अशी आशा सगळे व्यक्त करते होते. अशातच ही बातमी आल्याने सिनेमाची संपूर्ण टीम शोकसागरात बुडाली आहे. याबाबत अभिनेत्री, मॉडेल दिशा परदेशीने आपल्या फेसबुकवर पोस्टही केली आहे. त्यात कर्नाड यांच्यासोबतचा एक फोटो तिने शेअर केला आहे.



जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटानंतर तब्बल 30 पेक्षा जास्त वर्षांनी कर्नाड पुन्हा एकदा मराठी चित्रपटाकडे वळले होते. पण दुर्दैवाने हा चित्रपट ते हयात असेपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही. सिनेमात असलेल्या काही दृश्यांमुळे हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्याचं कळतं आहे. हा चित्रपट जंगलात शूट झाल्यामुळे यात काही पक्षी, प्राणी यांचा समावेश असल्याने तो चित्रपट अडकला आहे. याबद्दल दिग्दर्शक वा चित्रपटाचे निर्माते यांच्याशी अद्याप बोलणे होऊ शकलेलं नाही. पण कर्नाड यांच्या हयात असेपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता असं सर्वांना वाटत असल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपटातील एका कलाकाराने सांगितलं आहे. आता सरगम हाच कर्नाड यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला आहे.