मुंबई : भारतातील सद्यस्थितीबद्दल अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी चिंता व्यक्त केली आहे. समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. या घटनेवर देखील शहा यांनी भाष्य केलं आहे.


शहा यांनी म्हटले आहे की, आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असंही ते म्हणाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलिस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं. 'देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,' असं शहांनी म्हटलं.

गाईचे प्राण पोलीस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल', अशा शब्दांत देशातील परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, देशातील सध्याच्या परिस्थितीचा चीड येते, लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा,' असेही शहा यांनी म्हटले आहे.