मुंबई : पाकिस्तानने बॉलिवूडसाठी आपली दारं पुन्हा खुली केली असली, तरी काही बाबतीत पाकची भूमिका आडमुठी आहे. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर 'दंगल' चित्रपटातील तिरंग्याच्या सीनला कात्री लावण्याचा हट्ट पाकने धरला होता. मात्र त्याला न जुमानता अखेर पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय आमिर खानने घेतला आहे.


भारताविरोधात पाकिस्तानच्या कुरापती वारंवार सुरु असल्यामुळे पाक कलाकारांना भारतातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तसंच पाक कलाकारांना यापुढे भारतीय चित्रपटात काम न देण्याचा चंग बांधण्यात आला. त्यानंतर पाकनेही बॉलिवूडपट रिलीज न करण्याचा फतवा काढला, जो काही दिवसांतच मागे घेण्यात आला.

आमिर खानचा 'दंगल' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. डिसेंबर 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या दंगलने 385 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पाकिस्तानी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेंसॉरने गेल्या आठवड्यात दंगल चित्रपटातील दोन दृश्यांना कात्री लावण्याची मागणी केली होती. या दोन दृश्यांमध्ये भारतीय तिरंगा आणि राष्ट्रगीताचा समावेश आहे.
मात्र पाक बोर्डाचं हे फर्मान ऐकून आमिरने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित दृश्यात काहीच कट्टर देशभक्तिपर नाही, त्याचप्रमाणे इतर देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील, असा कुठलाच आशय या सीन्समध्ये नाही. त्यामुळे एक तर हा चित्रपट प्रदर्शित करावा, किंवा अजिबात करु नये, कुठल्याही दृश्यांना कात्री लावली जाणार, अशी भूमिका आमिरने घेतली होती.