मुंबई : बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांना बलात्काराप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. लेखिका विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर सूड उगवण्याच्या हेतूने आरोप केल्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली आहे. विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आलोकनाथ यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी कोर्टात अर्ज दाखल केला होता.
दिंडोशी सत्र न्यायलयाने पाच जानेवारीला आलोकनाथ यांना पाच लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरीम जामीन दिला. तसेच आलोकनाथ यांना या प्रकरणात फसवण्यात आलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील न्यायालयाने अधोरेखित केलं. त्यामुळे लेखिका विनता नंदा यांनी आलोकनाथ यांना खोट्या प्रकरणात फसवलं का, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.


सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस ओझा यांनी आलोकनाथ यांचा जामीन अर्ज मंजूर केला. फिर्यादीने संबंधित प्रकरणाबाबत 20 वर्षांनंतर गु्न्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या कार्यकाळात प्रकरण रंगवूनही सांगितलं जाऊ शकतं, अशी शक्यता न्यायाधीश ओझा यांनी वर्तवली. फिर्यादींना 20 वर्षापूर्वीची घटना आठवते मात्र त्यांना घटनेची तारीख आणि महिना आठवत नाही, असेही न्यायाधीश ओझा म्हणाले.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'मी टू' मोहीम छेडल्यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. लेखिका विनता नंदा यांनीही कैक वर्षांपूर्वीची आपबिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आठ ऑक्टोबरला सर्वांसमोर मांडली होती.

विनता नंदा यांच्या आरोपांनंतर जवळपास दीड महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात आलोकनाथ यांनी विनता यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

विनता नंदा यांची फेसबुक पोस्ट

'त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पित बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो' असं विनता नंदांनी लिहिलं होतं.

'त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहे, असं मला वाटत होतं. मला जरा वेगळंच जाणवायला लागलं. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटलं. तिथे फार काळ थांबणं मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचं ठरवलं' असं विनता यांनी पुढे लिहिलं होतं.

'अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमकं काय झालं हे मला अंधुक आठवतंय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझं लैंगिक शोषण केलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर फक्त बलात्कार झाला नव्हता, तर माझ्याच घरात माझ्यावर भीषण अत्याचाराचा झाले होते' असा दावा विनता यांनी केला होता.