मुंबई : बहुचर्चित चित्रपट 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यांला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शकांना चित्रपटात लवकरात लवकर बदल करण्यास सांगितले आहेत.


जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत. त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा. अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.' एवढच नाहीतर ट्विटमध्ये आव्हाडांनी पुढे म्हटलं आहे की, 'याला धमकी समजली तरी चालेल'.

'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केल्यानंतर अजूनपर्यंत चित्रपटाचे निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांच्याआधी संभाजी ब्रिगेडनेही एका पत्रकामार्फत दिग्दर्शकांकडून चित्रपटातील काही दृश्यांबाबत स्पष्टिकरण मागितलं होतं. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे म्हटलं जात आहे.


दरम्यान, 'तानाजी : द अनसंग वारियर' या चित्रपटात स्वतः अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर याव्यतिरिक्त सैफ अली खान राजपूत मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढच नाहीतर मराठी अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री पद्मावती राव रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात काजोलही झळकणार असून ती तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.