मुंबई : “दया... कुछ तो गडबड है’ या डायलॉगला जवळपास 18 वर्ष पूर्ण झाली. हा संवाद एके दिवशी मी आणि मालिकेचे दिग्दर्शक बी.पी. सिंग चर्चा करत होतो. या चर्चेवेळी रंगभूमीचा कलाकार असल्याने माझे हातवारे सुरु होते. हे पाहून त्यांनी मला मध्येच थांबव, ‘तू हे काय करत आहेस?’ असं विचारलं. यावेळी मी तुमच्याशी चर्चा करत असल्याचं म्हटलं. पण त्यांनी विचारलं, ‘तू चर्चा नाही, तर हे हातवारे का करतोयस?’ असं विचारलं. त्यावर मी त्यांना ही माझी नेहमीची सवय असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी मला असे हातवारे तू मालिकेच्या शूटिंगमध्ये करशील का असं विचारलं? मी म्हटलं हो नक्कीच. पण कुठे वापरायचं हे विचारलं. त्यानंतर एका सिनदरम्यान जर एसीपी विचारात असेल, तर तो काय म्हणेल, हे करुन दाखवलं, आणि त्यानंतरच ‘दया… कुछ तो गडबड है’ हा संवाद जन्माला आला.”


सीआयडी मालिकेला 20 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने अभिनेते शिवाजी साटम 'माझा कट्टा'वर आले. यावेळी त्यांनी ‘दया… कुछ तो गडबड है’ या संवादाचा कसा जन्म झाला याबाबतचा किस्सा सांगितला.

दरम्यान, सीआयडीसारख्या मालिकांमुळे समाजातील गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांचेही त्यांनी यावेळी खंडन केलं. “गुन्हे घडतात, त्यामुळे तपास होतो. त्यामुळे सीआयडी सारख्या मालिकांमुळे गुन्हेगारी वाढली, असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. जर समाजात गुन्हेच घडले नसते, तर तपास यंत्रणाही उभाराव्या लागल्या नसत्या,” असं परखड मत ही त्यांनी यावेळी मांडलं.

सीआयडीच्या यशाबद्दल शिवाजी साटम म्हणाले की, “सीआयडी मालिकेने जनमानसात स्वत:ची वेगळी ओळख नक्कीच निर्माण झाली. पण यामुळे मालिकेचं टाईट शेड्यूल आणि इतर कारणांमुळे नाटकांत काम करणं बंद करावं लागलं. पण तरीही मालिकेच्या यशामुळे आपण समाधानी असल्याचं मत व्यक्त केलं.