मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षयकुमार दत्तक घेणार आहे. ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, ते गाव अक्षय दत्तक घेईल.


अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अभिनेता अक्षय कुमार यांची बुधवारी भेट झाली. त्यावेळी अक्षयने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मुनगंटीवारांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याबाबत सुचवलं.

ज्या गावात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या त्या गावांचा अभ्यास करुन सरकार प्रस्ताव देणार आहे. यापूर्वीही मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांना अक्षयने मदतीचा हात दिला आहे. अक्षय कुमारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी 90 लाखांची मदत जाहीर केली होती. त्यामुळे बॉलिवूडच्या रील लाईफ खिलाडीचं रिअल लाईफ दातृत्वही चाहत्यांमध्ये कौतुकाचा विषय आहे.