श्रीनगर : देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांना जवानांना मदत देण्याची ईच्छा आहे. मात्र त्यासाठी कसलाही मार्ग उपलब्ध नाही. म्हणून जवानांचा बँक खाते क्रमांक, वैयक्तिक माहिती, अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल, असं अॅप तयार करण्यात यावं, असं मत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने व्यक्त केलं आहे.


अक्षय कुमारने जम्मूतील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पवर जाऊन शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात शहिद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यासाठी अक्षय जम्मूत दाखल झाला आहे. यावेळी अक्षयने जवानांना संबोधित केलं.

बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेता म्हणून अक्षयची ओळख आहे. अक्षयने त्याचा जवानांविषयीचा आदर नेहमीच सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हॉलिडे, बेबी, सैनिक अशा सिनेमात त्याने सैनिकाची भूमिका साकारली आहे.

पाहा या बातमीचे आणखी फोटो


दुष्काळग्रस्तांसाठी, देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रति अक्षयची संवेदनशीलता नेहमीच दिसून येते. अक्षयने नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.

अक्षय त्याचा आगामी सामाजिक विषयावरील सिनेमा 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या सिनेमाची शूटिंग मथुरेत करत आहे. 'स्वच्छ भारत मोहिम' हा या सिनेमाचा विषय आहे.