मुंबई : सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या प्रेम प्रकरणाची आणि ब्रेकअपची कल्पना सर्वांनाच आहे. मात्र त्या प्रकरणावरुन छेडण्याचा मोह काही जणांना आवरता येत नाही. आडून आडून प्रश्न विचारणाऱ्या काही जणांनी आता थेट विषयाला हात घातला.


 
निर्माते वाशू भगनानी यांच्या कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत एकाने 'भविष्यात सलमानसोबत काम करणार का?' असा प्रश्न ऐश्वर्या राय बच्चनला विचारला. मात्र पत्रकाराच्या आगाऊ प्रश्नामुळे ऐश्वर्याचा पारा चांगलाच चढला.

 
ऐश्वर्याने हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम तात्काळ थांबवला. इतकंच नाही, तर या प्रश्नाचं आणि त्यानंतर तिने फणकारल्याचं झालेलं व्हिडिओ शूट डिलीट करण्याचा इशाराही तिने दिला. वाशूंचा मुलगा, अभिनेता जॅकी भगनानीने या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र ऐश्वर्या इतकी चिडली होती, की तिने सर्व पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं 'स्पॉटबॉय.कॉम'च्या वृत्तात म्हटलं आहे.

 
विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात रिओ ऑलिम्पिकसाठी सलमानच्या गुडविल अॅम्बेसेडर म्हणून झालेल्या निवडीवर ऐश्वर्याने अप्रत्यक्ष समर्थन दर्शवलं होतं. अनेक स्तरातून सलमानवर टीकेची झोड उठली असताना ऐश्वर्याच्या पाठिंब्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.

 
“जर एखादी व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं करत असेल आणि कुणाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा असेल, तर मग क्रीडा क्षेत्र असो, संगीत असो किंवा कला, अशा व्यक्तींचं स्वागतच करायला हवं.” असं मत तिने व्यक्त केलं होतं. त्यामुळे पुन्हा दोघं एकत्र काम करण्याची शक्यता निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.